नाशिक मधील सुप्रसिद्ध कवयित्री सीमाराणी बागुल यांच्या ‘गर्भारलेल्या मातीतून ‘ या आशय प्रधान कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा
सीमा राणी बागुल यांच्या “गर्भारलेल्या मातीतून” कविता संग्रहाचे प्रकाशन नाशिक येथे थाटात संपन्न!*
*गर्भारलेल्या मातीतून वेदनेचा हुंकार ऐकायला येतो.*
नाशिक मधील सुप्रसिद्ध कवयित्री सीमाराणी बागुल यांच्या ‘गर्भारलेल्या मातीतून ‘ या आशय प्रधान कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दि.१०मे२०२५ रोजी कवी नारायण सुर्वे कवी कट्टा सिडको येथे पार पडला.समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी उत्तम कोळगावकर होते.
ख्यातनाम साहित्यिक चंद्रकांतदादा वानखेडे ,पुणे यांचे हस्ते या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.या प्रसंगी डॉ.प्रमोद काकडे, अमरावती मा.केंद्रिय अध्यक्ष अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र, तान्हाजी खोडे,प्रकाशक ज्ञानसिंधु प्रकाशन , मा.रविका़त शार्दुल, मुखपृष्ठकार कु.खुशी मोरे, कवयित्री सीमाराणी बागूल प्रामुख्याने विचारपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कवी राज शेळके यांनी केले. डॉ.प्रमोद काकडे यांनी सीमाराणी बागुल यांच्या काव्य निर्मितीच्या प्रतिभेवर प्रासंगिक आणि समयोचित भाष्य केले.शिक्षिका असलेल्या सीमाराणी यांच्या या कविता समाज प्रबोधक तितक्याच आशयगर्भ व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
कवयित्री सीमाराणी बागुल यांची कविता म्हणजे वेदनेचा हुंकार असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत दादा वानखेडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले. गर्भारलेल्या मातीतून वेदनेचा हुंकार कवितांमधून आला आहे. स्रीचे जगणं दुःख आणि दुःखाचे कंगोरे नेमकेपणाने कवियत्रीने शब्दात मांडले आहे.कविता जनमनाचा ठाव घेणारी असावी, सीमाराणी बागुल यांच्या कविता साहित्य दृष्टीने अक्षय आहे. आणि कवितासंग्रहाच्या अंतर्बाह्य धाटणीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ कवी उत्तम कोळगावकर यांनी कौतुक केले.याप्रसंगी सुंदर मुखपृष्ठ रेखाटनासाठी कु्.खुशी मोरे हिचा सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे परीक्षण जयश्री वाघ, रविंद्र दळवी यांनी केले. कविता सादरीकरणात प्रथम शुभांगी पाटील, द्वितीय सोमदत्त मुंजवाडकर, तृतीय गजानन उफाडे यांच्या कवितांचा सन्मान चिन्ह गुलाब पुष्प शाल देऊन सन्मान करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गिरी यांनी केले. तर आभार प्रदर्शन सोनाली शिरवाडकर यांनी केले.कार्यक्रमास नाशिक जिल्हा व इतर जिल्ह्यातून बहुसंख्य कवी, लेखक, साहित्य रसिकांनी हजेरी लावली.